नमस्कार, वट पौर्णिमे निमित्त -
अगदी पूर्वी मुंबई, दादर, ठाणे उपनगरांत वड पिंपळ औदुंबर आंबा असे भव्य वृक्ष खूप होते
काही भागात बऱ्यापैकी जंगल होते , आता त्यातील बरेच वृक्ष तोडून मोठ्या वसाहती
उभ्या राहिल्या आहेत, मी जिथे आता तात्पुरता राहतो त्या वसाहतीत शिरण्यासाठी एक
रस्ता विकसित झाला , त्या रस्त्यावर अगदी मधोमध रस्ता दुभाजक म्हणून जणूकाही
तो वटवृक्ष उभा आहे, तिथून नेहमी जाता येताना मला त्या वृक्षाविषयी काहीतरी वाटायचे ,
आणि वट पौर्णिमेला त्याच्या फांद्या तोडायला कोणीतरी आले आणि जणू त्या वडाचे शब्द
माझ्या कानावर ऐकू यायला लागले, शहरात उरले सुरले वृक्ष आहेत त्यांच्याही ह्याच
भावना असतील कदाचित ? - सुरेश पित्रे, ठाणे
मी आहे वटवृक्ष एकटाच उभा !
वट पौर्णिमेसाठी एक माणूस आला वडाजवळ फांद्या तोडायला
मीही दुरून पहात होतो, त्या वडाचे बोल कानावर पडायला लागले
कुऱ्हाड घेऊन तू आला आहेस माझ्या फांद्या तोडायला
फांद्या रस्त्यावर जाऊन पडतील सुवासिनींना विकायला
माझ्या अंगा खांद्यावर चालविणार आहेस का तू कुऱ्हाड ?
पण जरा बघ ! पक्षी, पाखरांनी थाटलय तिथे वर बिऱ्हाड
आहे मी एकटा रस्त्यामधे, सग्या सोयऱ्यांच्या आठवणीत झुरतोय
होते इथे जंगल, माझ्या सभोवती सखे ,सोयरे, माझे सोबती
बिल्डर नामक राक्षसाने, मुळासकट त्यांना उखडून टाकलं
पाण्याविना तडफडून सुकून मरून गेले माझे सख्खे सोबती
सुदैव माझं मी राहिलो जिवंत, उभा एकटाच आज रस्त्यावरती
तुम्ही पहात होतात स्वप्नं कधी पूर्ण होतील ह्या इमारती
माझ्या सख्यांची करून माती, स्वप्न तुमची पुरी होणार होती
मी आणि माझे सोबती देत होते शुद्ध हवा आणि प्राणवायु
आता मी मात्र सतत हुंगतो आहे वाहनांचा विषारी काळा धूर
हो आह्मी हुंगतो कार्बन डाय ऑक्साईड , पण इतके प्रदुषण ?
झाडे कापून माणूस आळवितो आहे शहरांचा कर्कश्श सूर
माझ्या सग्या सोबतींचा जीव घेऊन उभ्या राहिल्या ह्या इमारती
तिथे अनेक माणसांचा , कुटुंबांचा झाला आहे वंश विस्तार
मलाही वाटते, इथे खाली जमिनीवर माझ्या पारंब्या रुजवाव्यात
पण आता जमिनीवर डांबर टाकून, रस्ता झाला आहे टणक आणि
नेमाने तुम्ही स्वतःचे कापता केस , तशाच कापता माझ्या पारंब्या
नाहीतर त्यांच्या मुसक्या बांधून आवळून माझ्याच अंगावर बांधून ठेवता
आता वट पौर्णिमेला माझी पूजा करायला कमी येतात त्या सुवासिनी
माझ्याभोवती ओतलय डांबर , त्यामुळे जमिनीत मुरत नाही पाणी
मीही आता वाट पाहतो कधी येईल पाऊस आणि मिळेल मला पाणी
पूर्वी कधी काळी प्रदक्षिणा करताना लक्ष तरी देत होते माझ्याकडे कोणी
नशीब माझे, देवाने योजना केली आहे वेगळी माझ्या वंश विस्ताराची
ते पक्षी खातात माझी फळे , विष्ठा टाकतात जमिनीवर, इमारती वरती
त्या इमारतीवर कुठेही रुजतात त्या पक्षांच्या विष्ठेतल्या बिया, आणि !
त्याच इमारतींवर उगवली आहेत वडाची कोवळी रोपे, वाढेल तो वट - वंशवेल
ती रोपे सांगत आहेत कि हो ! इथेच होते आमचे सखे, सोयरे आणि सोबती
उखडून टाकून मारून टाकलेत त्यांना तरी, खुंटणार नाही हा वटवंश
तुमच्या आधी आमचाच होता ह्या जमिनीवर पहिला राहण्याचा हक्क
मी आहे वटवृक्ष एकटाच ! रस्ता दुभाजक बनून रस्त्याच्या मधोमध उभा
माझ्या दोन्ही बाजूने सतत चालु असते वर्दळ आणि ये - जा वाहनांची
त्रास होतो ! पण सवय झाली आहे आता वाहनांच्या भोंग्यांच्या कर्कश्श आवाजाची
कान किटले आहेत ह्या शहरी गोंगाटाने , गुदमरून गेलोय वाहनांच्या धुराने
सग्या सोयऱ्यांच्या आठवणीत, दुर्दम्य आशा ठेवुन आहे फक्त जगण्याची .
लेखक / कवी - सुरेश पित्रे, ठाणे